TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 6 ऑगस्ट 2021 – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेत. आता ऑनलाईन परीक्षेमध्ये ते पास झालेत. त्यांनी आता आरक्षण द्यावं, नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. रावसाहेब दानवे हे दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रावसाहेब दानवे म्हणाले, काही गणितं केंद्राने सोडवली आहेत. तर आता काही गणितं राज्य सरकारने सोडवावीत. यावेळी दानवेंनी आरक्षणावरून सरकारवर सडकून टीका करत त्यांनी मुंबई लोकलसंदर्भात देखील भाष्य केलं.

लोकल रेल्वे सर्वसामन्यांना सुरू करण्याचा निर्णय एक मिनिटामध्ये घेऊ शकतो. राज्याने केवळ अहवाल पाठवावा. आम्ही राज्य सरकारच्या अहवालाशिवाय निर्णय घेऊ शकत नाही, असे हि रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे भाजपने राज्यात आंदोलनाचा इशारा दिलाय असंही रावसाहेब दानवे म्हणाले.